Sunday, March 19, 2023

international Sparrow Day

निमित्त जागतिक चिमणी दिनाचे .....     
            साधारण जस समजायला लागलय तस... आम्ही आमच्या गावच्या घरी ज्वारी आणि मक्याची शेलकी कणसं एकत्र बांधून लगला आडकवलेली  पाहिली आहेत. त्यावेळी मनात एकच विचार यायचा की का बर ही कणसं आडकवली असतील? अन ह्या चिमण्या शेतात, मळ्यात धान्य खातात मग इथ का अजून पुन्हा दाणे खायला येतात? ... हा प्रश्न सतत भंडावून सोडायचा. विचार करून थकल्यावर मी नेहमीप्रमाणे आजोबांना विचारले की आबा ही कणसं अशी का इथ टांगलीत? ... तर त्यावर त्यांनी अगदी माफक शब्दात सांगितल की ह्याच्या माग दोन कारण आहेत एक म्हणजे आपल्याकडे बारमाही पीक नसत अन् त्यामुळे पक्षांना खायला काही मिळत नाही. अन् दुसरं म्हणजे जर पक्ष्यांच्या हातून जर काही शिल्लक राहील तर ते आपण पुढच्या वर्षी बियाणं म्हणून वापरायचे. उत्तर सरळ होत पण मला काही पटल नाही की पक्षांना मळ्यात पण खायला द्यायच अन् घरी पण हे कस काय?        
                        त्यावेळी आबा म्हणाले की मोठा झालास की कळेल....                                                                                                                                      त्यावेळी मी तो विषय तिथेच सोडून दिला. काही दिवसानी किंबहुना एक दोन वर्षानी साधारण २००४ ते २००६ च्या दरम्यान आमच्या तालुक्याला एक भयंकर दुष्काळ पडला सुरुवातीला पाण्याची टंचाई जाणवू लागली, पाण्यासाठी लोक इतरत्र भटकू लागली, विहिरीची खोली वाढत गेली, पायऱ्या नसणाऱ्या विहिरीत लोक साखळी करून जीवावर उदार होऊन एका कळशीपायी भांडण करू लागली, सात ते आठ परसावरून लोक पाणी शेंदूण काढू लागली, सायकलीला आकड्यां वापरून लोक पाण्याची वाहतुक करू लागले, दोन दिवसाशीवाय आंघोळ मिळेनाशी झाली, लोक गढूळ पाणी देखील जपून वापरायला लागली, काही दिवसानी विहिरी देखील आटल्या मग जवळपासच्या तळ्यातील पाणी टँकरने चार पाच दिवसाआढ यायला लागल.. एकीकडे माणसांची ही परवड होत होती तर दुसरीकडे पिकांनी अन् जनावरांनी माना टाकायला सुरुवात केली होती. पीक अक्षरशः जाग्यावर करपून गेली होती. ज्वारीला तर पान म्हणून कसल दिसत नव्हत. शेळ्या- मेंढ्याची पोट पाक भकाळीला गेली होती, नाईलाजास्तव लोक आपल लाडक पशुधन ईकत होती,  दुभत्या जनावरांच्या अंगावर कळा राहिली नव्हती, भाकड जनावरांना घ्यायला खाटीक सुध्दा धजावत नव्हते, अन् चारा छावणी घर शेतापासून दूर होत्या.
           आंबा, चिंच, जांभळ ह्यासारखी झाड शेंड्याकडून करपत चालली होती. जिवांचे अगदी हालहाल चालले होते. आम्ही शहरातून सुटी साठी आलो होतो पण हे द्रूश्य पाहून काही सुचेनास झाल होत पण ह्यासाठी काहीच करता येत नव्हत.फारतर जवळपासच्या वीहीरीतल पाणी शेंदून आणायला  मदत करण अथवा सायकल वरून घागरी वाहायला मदत करण एवढच करण्यासारख होत. एखाद्या झाडाला पाणी घालाव तर वापरायला पाणी नाही.
            पक्ष्यांना खायला प्यायला पाणी मिळणं कठीण झाल होत, पक्षी तर तडफडून  मरत होते, एकेकाळी मुक्त विहार करत फिरणारी घरचिमणी हि त्यावेळी क्वचित दिसत होती, अन माळावर चिमण्या आहेत कि नाहीत हा प्रश्नच पडत असे. ब-याचदा ह्या चिमण्याना अगदी घरात आमच्या माळवदाच्या घरातील लगवर, एखाद्या घरातील फोटोमागे घरटी करताना तसेच घरात चिवचिवाट करत मुक्त विहार करताना पाहिल आहे. ब-याच लोकाना आताकुठे निर्जंतुकीकरणाच महत्व पटायला लागलय पण  हे  छोटे छोटे पक्षी अगदी मुक्तपणे धुळीने आंघोळ करुन आपले शरिर निर्जंतुक ठेवल जायच. त्यावेळचा तिचा वावर आताच्या घडीला खुप काही सांगून जातो. चिमणी कावळ्याच्या गोष्टी मधली चिमणी अगदी त्या गोष्टी पुरतीच राहतेय की काय असे वाटतेय. आज तिचा निवाराच अगदी संपुष्टात आल्याने अन् अशातच वाढत्या मोबाईल टॉवरमुळे चिमणी अन् ईतर लहान जिव यांच अस्तित्वच धोक्याच्या पातळीच्या वर गेल आहे.  त्यावेळी मला ही कणसं टांगून ठेवण्यामागच कारण अगदी उदाहरणासहीत समजल. अन् त्यादिवशीच ठरवल की आपल्याला शक्य होईल तेवढ तरी ह्या मुक्या पक्ष्यांना आपण दिल पाहिजे अन् कुणी तरी म्हटलं पण आहे की , " दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम..." त्यासाठी जमेल तस पाणी भांड्यात, गाडगे, मडक्यात ठेवण, खायला धान्य ठेवण हे चालू केल. 
        आपण फक्त निमित्तमात्र म्हणून हां केलेला अट्टहास ......
 आपलाच- वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी .